महामार्ग पूर्ण होईपर्यंत पुढील १७ वर्ष टोल भरू नका” ; विजय देसाईंचा सरकारवर हल्लाबोल
चिपळुणात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा संपन्न.कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (ओंकार रेळेकर) “सतरा वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडवून सरकारने कोकणवासीयांची क्रूर चेष्टा केली. असंख्य कोकणी लोकांचे बळी गेले. महामार्ग पूर्ण होईपर्यंत पुढील सतरा वर्ष कोकणवासीयांनी टोल भरू नये,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक विजय देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी नाव न घेता माजी आमदार रमेश कदम यांच्यावरही जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रविवारी चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात भव्य कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना विजय देसाई यांनी सत्ताधारी गटासह काही माजी पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली.
“चिपळूणचे काही नेते पालकमंत्र्यांच्या घराबाहेर फिरत असतात. पण पक्षाने तुम्हाला काय कमी दिले? आमदारकी दिली, नगराध्यक्ष केले, अजून काय हवे होते?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.ते पुढे म्हणाले, “शरद पवार यांनी अनेकांना मोठे केले, पदे दिली, प्रसिद्धी दिली. मात्र केवळ शरद पवारांनी फोन केला नाही, एवढ्या कारणावरून पक्ष सोडून जाणे योग्य नाही. शरद पवारांनी एवढा सन्मान दिल्यानंतर आणखी काय द्यायला हवे होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांना उद्देशून ते म्हणाले, “आजपासून तयारीला लागा. इथे बसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता पुढील तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत आमदार झाला पाहिजे. त्यासाठी पक्ष वाढवूया असे ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई, महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, प्रवक्ते महेश चव्हाण,जिल्हाध्यक्ष सुरेश बने,सतीश खेडेकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश सावंत,सेवा दल जिल्हाध्यक्ष याकुब खान,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, कार्याध्यक्ष शिरीष काटकर,तालुका अध्यक्ष राजेश केळकर,युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी,नियाज सनगे,
जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद,जिल्हा सचिव मिनल बांदेकर,जिल्हा सदस्य सोनिया लोहिया,उपशहरध्यक्षा दिपा कोलतेकर,महेंद्र कदम यासीन खान मुन्ना जसनाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हा मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष बारक्याचे बने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी विशेष मेहनत घेतली.
जिल्हाध्यक्ष सुरेश बने म्हणाले रमेश कदम यांनी या पक्षासाठी भरपूर काम केले. त्यांनी राजीनामा दिला
तेव्हा मी स्वतः त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याच्या प्रयत्न करणार होतो परंतु त्यांनी वेळ दिला नाही. त्यांनी
राजीनामा दिला हे दुर्दैवी आहे.परंतु आता थांबून चालणार नाही.पक्षाची बांधणी करावी लागेल. त्या अनुषंगाने
आम्ही पुन्हा कामाला लागलो असून चिपळूणमध्ये पुन्हा पक्ष ताकदीने उभा करू, नवीन तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष
महिला तालुकाध्यक्ष चांगले काम करतील असा विश्वास ही सुरेश बने यांनी यावेळी व्यक्त केला.
फोटो : प्रदेश निरीक्षक विजय देसाई यांनी अविनाश केळसकर यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी बारक्याशेठ बने आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




