‘उद्योग-व्यवसायात आपल्या भगिनी उच्च पदावर पोहोचल्या पाहिजेत, हाच जिजाऊ संस्थेचा मुख्य उद्देश’ : निलेश सांबरे
प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी पुढे आल्या पाहिजेत मुलांकडे हात पसरण्यापेक्षा मुलांना नवऱ्याला आधार देणाऱ्या सक्षम भगिनी झाल्या पाहिजेत

आबलोली येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचा शुभारंभ
चिपळूण (ओंकार रेळेकर) : “उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात आपल्या भगिनी उच्च पदावर पोहोचल्या पाहिजेत, हाच जिजाऊ संस्थेचा मुख्य उद्देश आहे. मुलांकडे हात पसरण्यापेक्षा मुलांना आणि नवऱ्याला आधार देणाऱ्या सक्षम भगिनी घडल्या पाहिजेत.”
“आपण केवळ घेणारे नव्हे, तर देणारे झालो पाहिजे.संघटित होऊन समाजाच्या उत्कर्षासाठी लढलो पाहिजे.उद्योग क्षेत्रात आपला कोकणी माणूस प्रत्येक ठिकाणी पुढे दिसला पाहिजे, यासाठी जिजाऊ संस्था प्रयत्नशील आहे,”असे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आबलोली येथे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी झाला.निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
आबलोली येथील सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात सांबरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
महिलांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास त्यांच्या उत्पादनांना मुंबईसह विविध मोठ्या शहरांमध्ये चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम जिजाऊ संस्था करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुलांना अद्ययावत शिक्षण प्रणाली उपलब्ध व्हावी, यासाठी भविष्यात सीबीएसई बोर्ड पॅटर्नचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही सांबरे यांनी स्पष्ट केले.निलेश सांबरे यांच्या रूपाने आपल्याला साक्षात परमेश्वर भेटला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ संस्थेच्या वतीने महिलांसाठी समाज उपयोगी जे उपक्रम राबवले जातात त्याचा महिलांनी परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे त्यांच्यासोबत आपण राहिलो पाहिजे असे प्रतिपादन उद्योजक वसंत उदेग यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी जि.प. सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर, प्रगतशील शेतकरी व उद्योजक वसंत उदेग,केदार चव्हाण, आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य नम्रता निमुणकर व रुपाली कदम, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रगतशील युवा शेतकरी सचिन कारेकर, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच अल्पिता पवार, श्रावणी पागडे यांच्यासह ग्रामसंघांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी यांनी केले.
ग्रामीण महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोफत प्रशिक्षणाचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिलाईचे कौशल्य आत्मसात करून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.




