महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचा केंद्र-राज्य सरकारविरोधात निषेध
बहादुरशेख नाका येथे महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

बहादुरशेख नाका येथे महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन
चिपळूण (ओंकार रेळेकर)महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणं मुश्किल झाला आहे सरकारने याचा वेळीच विचार करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी केली.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी बहादुरशेख नाका येथे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत असून, कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ राखणे नागरिकांसाठी कठीण झाले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थव्यवस्थेवर होत आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्याऐवजी जनतेच्या आर्थिक अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“महागाई वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करत असेल, तर असे सरकार नको,” अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाढत्या महागाईला जबाबदार असलेल्या केंद्र व राज्य सरकारचा महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनावेळी जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद, चिपळूण तालुका अध्यक्ष आरुता आडविलकर, देवरुख तालुका अध्यक्ष दीपिका किरवे, जिल्हा सदस्य छायाताई माने, शहर उपाध्यक्ष दीपा कोलतेकर, तसेच दिव्या चव्हाण, रूपाली कदम, विटा शिंदे, दीपा माने, बिंदूताई पांचाळ यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




