देशाच्या विकासयात्रेत पत्रकारांचे योगदान मोलाचे : जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त पत्रकारांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी खेर्डी येथील स्वामींनी निवास साई मंदिर येथे पत्रकार बांधवांना पुस्तिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करत त्यांचे आभार व्यक्त केले.
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त ७ जून ते २५ जूनदरम्यान देशभर आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.पत्रकारांच्या मार्गदर्शक भूमिकेची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेली ‘अखंड भारत : १२ वर्षांची विकासगाथा’ ही पुस्तिका यावेळी पत्रकारांना भेट देण्यात आली.लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पत्रकारांनी पुढील काळातही विधायक सूचना, मार्गदर्शन आणि लोकहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.राष्ट्रहिताच्या कार्यात पत्रकारांचे सहकार्य भविष्यातही लाभत राहील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, सरचिटणीस स्वानंद रानडे,युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आदिती गुडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, पंचायत समिती सदस्य सायली वाजे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया देवरुखकर, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेविका रसिका देवळेकर, चिपळूण ग्रामीण प्रभारी रामदास राणे, मंडळ प्रभारी विजय चितळे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, जिल्हा चिटणीस अभिनव भुरण, दिपक महाडीक दिनेश आपिष्टे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




