मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी : महेश चव्हाण
महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका; चिपळूणमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)“केंद्रातील मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सरकार केवळ घोषणाबाजी करत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. याच नाराजीमधून युवकांना पर्याय म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचा उदय झाला आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश चव्हाण यांनी केले.
चिपळूण येथे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई, महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, प्रवक्ते महेश चव्हाण,जिल्हाध्यक्ष सुरेश बने,सतीश खेडेकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश सावंत,सेवा दल जिल्हाध्यक्ष याकुब खान,जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, कार्याध्यक्ष शिरीष काटकर,तालुका अध्यक्ष राजेश केळकर,युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी,नियाज सनगे,
जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद,उपशहरध्यक्षा दिपा कोलतेकर,महेंद्र कदम यासीन खान मुन्ना जसनाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.
चव्हाण म्हणाले, “मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले होते. मात्र बारा वर्षांनंतरही सामान्य जनतेच्या आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.”
ते पुढे म्हणाले, “सरकार लोकांना काटकसर करण्याचे सल्ले देते, पण स्वतः मात्र परदेश दौरे करते. लोकांना सोने खरेदी करू नका, खर्च कमी करा असे सांगितले जाते. मात्र महागाईमुळे अनेकांना आपली मालमत्ता, दागिने विकण्याची वेळ आली आहे.”
सरकार उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, “दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात युवकांना रोजगार मिळत नाही. उलट ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.”
“सरकार लोकांसोबत सतत फसवणूक करत आहे. घोषणा मोठ्या केल्या जातात, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. तरीही भाजप पुन्हा सत्तेत येते, ही संशोधनाची बाब आहे,” असा टोला त्यांनी लगावला.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, “लोकांशी सतत संपर्क ठेवा. अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे रहा आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. वागण्यात विनम्रता ठेवा. त्यातूनच जनतेमध्ये तुमची तळमळीचा कार्यकर्ता म्हणून प्रतिमा निर्माण होईल आणि लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील.”यावेळी अक्षय देसाई, शकील तांबे, महेंद्र कदम,शिरीष काटकर,सुजाता तांबे, सतीश खेडेकर, अविनाश उर्फ राजेश केळसकर आणि दीपा दाभोळकर यांनीही मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.प्रास्ताविक रईस अलवी यांनी केले. सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी तर आभार अक्षय केदारी यांनी मानले.




